Nagpur,Maharashtra,India
शिक्षणाधिकारी अटकेत, बदली करून घेऊनही अखेर सापडलेच

नागपूर : बनावट शालार्थ आयडी प्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला मंगळवारी (दि.२३) सकाळी अटक केली. यवतमाळ येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र शंकरराव काटोलकर असे आरोपी शिक्षणाधिकाऱ्याचे नाव असून त्यांना सकाळी यवतमाळ येथून पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले.
त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार असताना, ३९ बनावट शालार्थ आयडी तयार केले होते.
शालार्थ आयडी प्रकरणात उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी रवींद्र पाटील यांनी एप्रिल महिन्यात बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या चौकशीत सदर पोलिसांनी सर्वप्रथम उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सायबर पोलिसांकडूनही सुरू करण्यात आली. त्यात पोलिसांना ६६३ शिक्षकांचे शालार्थ आयडी बनावट असल्याची बाब समोर आली होती. त्यानुसार त्यांनी तपासास सुरुवात केली.
या तपासात नरड यांच्यासह, जामदार, पारधी, वंजारी या चार आजी माजी उपसंचालकांसह काळुसे, कुंभार आणि गोंदियातील शिक्षणाधिकाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे, नऊ लिपिक, तीन मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक, चार सहाय्यक शिक्षक असे एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून अटक सत्र सुरू होते. त्यातूनच काटोलकर यांच्यावरही ऑगस्ट महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच त्यांना चौकशीसाठीही बोलविण्यात आले होेते. मात्र, तेव्हा सायबर पोलिसांकडून त्यांना केवळ सूचनापत्र देऊन सोडण्यात आले होते. त्यानंतर सखोल चौकशी केल्यावर त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार असताना, शिक्षकांचे ३९ शालार्थ आयडी प्रस्तावाची शहानिशा न करता, त्यांचे थकीत आणि नियमित वेतन काढण्याचे काम केले. त्यातून शासनाचा बारा कोटी रुपयांचे नुकसान केले. त्यावरून काटोलकर यांना सकाळी यवतमाळ येथून पथकाने अटक केली. नागपुरात आणल्यावर त्यांना प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर केल्यावर त्यांची गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
अटकेच्या भितीने घेतली बदली !
रवींद्र काटोलकर हे जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना, त्यांना सायबर पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी बोलवले होते. दरम्यान त्यानंतर त्यांनी विभागीय शिक्षण मंडळात सहसचिव म्हणून बदल करून घेतली. मात्र, त्यानंतरही शालार्थ आयडी प्रकरणाचे शुक्लकाष्ठ त्यांच्यामागे लागल्याने त्यांनी शिक्षण मंडळातून अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली घेतल्याची चर्चा शिक्षण विभागात रंगली आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.