Ratnagiri,Maharashtra,India
जिल्ह्यात १,४९७ शिक्षक 'अतिरिक्त'
संचमान्यतेचा फटका, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण

रत्नागिरी, देवरूख : राज्याच्या शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या संचमान्यतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात मोठी उलथापालथ झाली असून तब्बल 1, 497 शिक्षक अतिरिक्त ठरल्याचे वृत्त सकाळ ने दिले आहे.
पटसंख्येचा नवा निकष आणि आधारकार्ड लिंक नसलेल्या विद्यार्थ्यांमुळे जिल्ह्यातील १ हजार १७ प्राथमिक तर ४८० माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात विद्यार्थी नोंदणीचे काम अत्यंत प्रभावीपणे झाले असून, ९८ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. केवळ २ टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी तांत्रिक कारणांमुळे किंवा आधार त्रुटींमुळे प्रलंबित आहे; मात्र नियमानुसार संचमान्यतेसाठी केवळ प्रमाणित (व्हॅलिड) विद्यार्थीच ग्राह्य धरले जातात.
हा मुद्दाही शिक्षक अतिरिक्त होण्यासाठी कारण ठरला आहे. इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आधार नोंदणीचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान असताना रत्नागिरीने ९८ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करूनही, १ हजार ०१७ प्राथमिक आणि ४८० माध्यमिक असे एकूण १ हजार ४९७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.
जिल्ह्यातील ६ वी ते ८ वीच्या शाळांमधील पटसंख्या कारणीभूत ठरली आहे. १९ पटापर्यंत एक पदवीधर शिक्षक मंजूर असल्यामुळे मोठ्याप्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. पटसंख्या केवळ १०-२० ने कमी भरली, तरी पूर्णवेळ शिक्षकाचे पद कमी होत असल्याने शाळांचे प्रशासकीय गणित पूर्णपणे बिघडणार आहे.
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना आता रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये सामावून घेण्याची (समायोजन) प्रक्रिया राबवावी लागणार आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकसंख्या कमी झाल्याने एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या गंभीर प्रश्नावर पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेऊन एकही शिक्षक जिल्ह्याबाहेर जाणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सध्या जिल्ह्यात समायोजन प्रक्रिया सुरू आहे.
अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांवर तात्पुरता मार्ग
जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या समस्येवर सध्या तात्पुरता मार्ग काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिकच्या ९७० पदवीधर शिक्षकांना रिक्त शाळांमध्ये उपशिक्षकांऐवजी नियुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे. तसेच सध्या जिल्ह्याबाहेर बदलीचा विषय काहीकाळ लांबणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्याबाहेर न करता जिल्ह्यातच करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शिक्षकांवर ओढवलेले विस्थापनाचे संकट टळले असून, यामुळे शिक्षकांना कौटुंबिक आणि मानसिक स्थैर्य लाभेल.
- दिलीप देवळेकर, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.