Satara,Maharashtra,India
बीएलओ ड्युटीवर असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू, शिक्षक संतप्त

अहिल्यानगर : महाराष्ट्रामध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेला सुरुवात होताच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे बीएलओ (Booth Level Officer) म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या प्राथमिक शिक्षिका सुनिता पोपटभट यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेनंतर राज्यभरातील शिक्षक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शाळेतील अध्यापनासोबतच मतदारयादी तपासणीसारखी अतिरिक्त कामे शिक्षकांवर लादली जात असल्याने प्रचंड मानसिक ताण निर्माण होत असल्याची तक्रार शिक्षक संघटना सातत्याने करत आहेत.
शाळाबाह्य कामांतून शिक्षकांना मुक्त करावे, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आता एका शिक्षिकेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप शिक्षकांकडून केला जात आहे.
माहितीनुसार, रविवारी (28 जून) सुनीता पोपळभट यांनी बीएलओचे साहित्य ताब्यात घेतले होते. त्यानंतर मतदारयादी पुनर्निरीक्षणाच्या कामाचा वाढता दबाव आणि सततचा तणाव यामुळे त्या मानसिक दडपणाखाली होत्या. मंगळवारी (30 जून) त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले.
या घटनेनंतर प्राथमिक शिक्षक समितीने प्रशासनावर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कामे करताना शिक्षकांना सरकारी कर्मचारी म्हणून जबाबदाऱ्या दिल्या जातात, मात्र संकटाच्या वेळी त्यांना कोणतेही स्पष्ट संरक्षण किंवा सुरक्षा हमी दिली जात नाही.
पाथर्डी तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मृत शिक्षिकेच्या कुटुंबाला राष्ट्रीय कर्तव्य बजावताना मिळणारे सर्व कायदेशीर संरक्षण, विमा लाभ आणि तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यासोबतच बीएलओ म्हणून काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना 'ऑन ड्युटी' संरक्षणाची लेखी हमी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, बीएलओ कामात हलगर्जीपणा झाल्यास काही ठिकाणी शिक्षकांवर थेट गुन्हे दाखल केले जात असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मतदारयाद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेचे काम अत्यंत अचूक आणि वेळेत पूर्ण करण्याचा दबाव असल्याने शिक्षकांमध्ये भीती आणि मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका शिक्षिकेचा जीव गेल्यानंतर आता शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, सरकारी काम करताना जबाबदारी आमची, पण संरक्षण कुठे? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
या गंभीर घटनेनंतर राज्य आणि केंद्र सरकार यावर काय भूमिका घेणार, बीएलओ म्हणून काम करणाऱ्या हजारो शिक्षकांना सुरक्षा, विमा आणि कायदेशीर संरक्षण मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.