A.Nagar,Maharashtra,India
अहिल्यानगरात 11 शिक्षक निलंबित,
अपंगत्वाचे प्रमाण आढळले कमी, शिक्षण क्षेत्रात खळबळ

अहिल्यानगर : जिल्हा सरकारी रुग्णालयाने केलेल्या पडताळणीत अपंगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळलेल्या जिल्हा परिषदेच्या १५ कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
यामध्ये ११ शिक्षक, ३ शिपाई (परिचर) व १ आरोग्य सेवकाचा समावेश आहे. यातील ८ जणांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेशही त्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्या मिळवण्याचे विविध विभागातील प्रकरणे गाजत आहेत. याच साखळीतील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. इतर विभाग कोणती भूमिका घेतात याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. काही वर्षांपूर्वी अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राचा आधारे बदली अथवा सरकारी सवलतींचा गैरफायदा घेणाऱ्या तब्बल ७८ प्राथमिक शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण अद्यापि न्यायालयीन प्रक्रियेत आहे. आता आणखी १५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राज्य सरकारने सर्व सरकारी विभागातील अपंग कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने तालुकानिहाय शिबिरे घेऊन अपंग कर्मचाऱ्यांची वैद्यकीय पडताळणी केली. जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५४५ विविध प्रकारचे अपंग कर्मचारी आहेत. त्यामध्ये सकृतदर्शनी १८० कर्मचारी अपंग असल्याचे आढळले. उर्वरित कर्मचाऱ्यांची पडताळणी जिल्हा सरकारी रुग्णालयामार्फत करण्यात आली. त्यामध्ये १८ कर्मचाऱ्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र ४० टक्क्यापेक्षा कमी आढळले. तसा अहवाल जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हा परिषदेला पाठवला. १९ कर्मचारी वैद्यकीय पडताळणीसाठी गैरहजर राहिले होते. अशा सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. यातील १५ जणांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश आज देण्यात आले आहेत. यातील एकाचा खुलासा मान्य करण्यात आला आहे तर एकाची पुन्हा पडताळणी करण्यात आले आहे. एका खुलाशाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या १९ कर्मचाऱ्यांची अपंग विभागाच्या उपसंचालक कार्यालयामार्फत पडताळणी केली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निलंबन कारवाई झालेले कर्मचारी
१) समाधान कचरू घुगे (आरोग्य सेवक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), २) सुनील दत्तात्रय वाघ (मुख्याध्यापक, कर्णबधिर), ३) प्रभाकर संतु चोखंडे (परिचर, अस्थिभंग), ४) दत्तात्रय आनंदराव फपाळे (मुख्याध्यापक, कर्णबधिर), ५) वामन जगन्नाथ घाटपांडे (परिचर अस्थिव्यंग, कायदेशीर कारवाई), ६) अतुल तुकाराम सातपुते (परिचर, अस्थिव्यंग), ७) मंदा तुकाराम शिंदे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), ८) संगीता विजय कदम (शिक्षक, अस्थिभंग), ९) संजयकुमार विश्वनाथ बडे (शिक्षक, अस्थिभंग), १०) वर्षा त्र्यंबक अकोलकर (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), ११) पुष्पलता दिनकर खेडकर (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), १२) सतीश मोहन लगड (शिक्षक, अस्थिव्यंग), १३) सागर रेवजी मोरे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), १४) विनायककुमार मगन वाडेकर (शिक्षक, अल्पदृष्टी, कायदेशीर कारवाई) व १५) संतोष हिरामण लष्करे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई )
आणखी १९ कर्मचाऱ्यांची तपासणी
जिल्हा परिषदेच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्राप्त झाले व त्यांनी नोकरीसाठी त्याचा लाभ घेतला अशा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी बदली किंवा इतर सरकारी सवलतींचा फायदा घेतला आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय इतर १९ जणांची पडताळणी उपसंचालक कार्यालयामार्फत केली जाणार आहे.
आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.